मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू, आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक या सगळ्या प्रकरणानंतर भाजप नेत्यांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यातच आता मुख्यमंत्री सचिन वाझे यांच्यासाठी इतक्या बैठका का घेत आहेत, असा सवालदेखील भाजपकडून विचारण्यात येत आहे.
भाजप मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते संजय कुटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासाठी रात्रंदिवस बैठका घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या प्रश्नांसाठी बैठकाचा असाच धडाका कधी लावणार, असा प्रश्नसुद्धा संजय कुटे यांच्याकडून विचारण्यात आला.
सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठका कधी
बाकीवेळेस दुपारनंतर शासकीय कामकाजाला सुरूवात करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गेल्या २- ३ दिवसांपासून बैठकामागून बैठका घेण्यात येत आहेत. हि आश्चर्याची गोष्ट आहे. अशा बैठका सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी घेतल्या जाणार, असा प्रश्नसुद्धा संजय कुटे यांनी विचारला आहे.
महाविकास आघाडी सरकारमुळे शेतकरी अडचणीत
हाविकासआघाडी सरकारने सत्तेत आल्यावर पीक विमा योजनेच्या निकषात बदल केल्याने राज्यातील शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिला आहे. नैसर्गिक संकटामुळे सोयाबीन, उडीद, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
महाविकास आघाडी सरकार दुटप्पी
महाविकास आघाडी सरकार हे दुटप्पी सरकार आहे. त्यामुळे सक्तीच्या वीजबिल वसुलीचे संकट शेतकऱ्यांपुढे आहे. विधानसभेमध्ये वीज बील वसुलीस स्थगिती दिल्यानंतर त्यांनी लगेच विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही स्थगिती उठवली. हे सरकार कोरोना परिस्थिती आटोक्यात ठेवण्यात अपयशी ठरले आहे असा आरोप संजय कुटे यांच्याकडून करण्यात आला आहे.