बहुजननामा ऑनलाईन टीम : महिन्याभराच्या सत्ता संघर्षणानंतर अखेर राज्यात महाविकासआघाडीचे सरकारच स्थापन झाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज (३० नोव्हेंबर) या नव्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. यावर आता माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी महाविकासआघडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘सत्तेवर आलेले सरकार नैतिकतेला धरून नाही ! शिवसेना नेते संजय राऊत यांनी बोलण्यावर मर्यादा ठेवल्यास हिताचं होईल, अशी खोचक टीका राम नाईक यांनी लगावली आहे.
कल्याणमध्ये आयोजित रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेत बोलत असताना राम नाईक म्हणाले कि, राज्यात मागील एक महिन्यात जे घडले ते योग्य नाही, मात्र आता जे होऊन गेले आहे, त्यावर अधिक चर्चा करत बसण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जायला हवे, असा सल्लाही राम नाईक यांनी यावेळी दिला.
दरम्यान, गोव्याच्या सत्तांतराबाबतच्या संजय राऊत यांच्या विधानाबाबत विचारले असता, नाईक यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत गोव्यालाच काय कुठेही जाऊ शकतील, मात्र अशी सगळी विधाने करताना राऊतांनी त्यांच्या बोलण्यावर मर्यादा ठेवल्या, तर ते त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या हिताचे ठरेल, असे राम नाईक यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com