पाटणा : वृत्तसंस्था – वादळी वार्यासह पावसाने हाहाकार माजविल्याने बिहार आणि उत्तर प्रदेशात जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी पावसात वीज कोसळून झालेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 110 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 32 लोक जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील दोन्ही राज्यात झाली आहे. पाटण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे.
बिहारच्या गोपालगंज, पूर्वी चंपारण, सिवान, बांका, दरभंगा, भागलपूर, मधुबनी आणि नवादा या जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस बिहारमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने पुढील 72 तासांचा अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहार आणि उत्तरप्रदेशातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि वीज कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकार बचावकार्यात तत्पर आहेत, मी मृतकांच्या परिवाराप्रती संवेदना व्यक्त करतो, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.