बहुजननामा ऑनलाईन टीम – आएएस दाम्पत्य अरविंद जोशी आणि टीनू जोशी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. आता या दाम्पत्याच्या 100 कोटींच्या बेनावी संपत्तीवर जप्ती येणार आहे. आयकर विभागानं यासंदर्भातील कारवाईला सुरुवात केली आहे. 100 कोटी किंमत असणाऱ्या 10 मालमत्ता आयकर विभाग लवकरच ताब्यात घेणार आहे.
फेब्रुवारी 2010 मध्ये आयकर विभागानं जोशी यांच्या भोपाळमधील घरी छापा टाकला होता. त्यांना या छाप्यात 3 कोटी रुपये आणि बेकायदेशीर संपत्ती संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रं हाती लागली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जोशी दाम्पत्याच्या बेकायदेशीर संपत्तीचा आकडा पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. आयकर विभागाच्या दिल्लीतील एज्युकेटींग ऑथोरिटी विंगनं या संपत्तीचं मूल्यमापन केलं आहे. 100 कोटींची संपत्ती जोशी दाम्पत्यानं जमवल्याच्या दाव्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
उच्च न्यायालयात या प्रकरणासंदर्भातील अनेक याचिका रद्द करण्यात आल्यानंतर नोटीस जारी करून जोशी दाम्पत्याकडून या संपत्तीसंदर्भात उत्तर मागवण्यात आलं होतं. मात्र त्यांना या संपत्तीचा योग्य तपशील न्यायालयासमोर सादर करता आला नाही. त्यामुळंच आता कायदेशीर लढाईनंतर ही संपत्ती कायदेशीर पद्धतीनं कमावलेली नाही असा ठपका ठेवून आयकर विभागानं कारवाईला सुरुवात केली आहे.
क्रिकेट अकॅडमी
अरविंद आणि टीनू जोशी यांच्या संपत्तीत फेथ ग्रुपचे मालक राघवेंद्र सिंह तोमर यांची हिस्सेदारी असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. दिल्लीतल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी फेथ बिल्डर आणि गोल्डन बिल्डरविरोधात कारवाई केली होती. त्यानंतर फेथ ग्रुपच्या मालकीच्या 10 ते 15 एकर जमिनीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेथ ग्रुपच्या मालकीची सांगण्यात येणारी ही जमीन अरविंद जोशींचे वडिल एच एम जोशी आणि आई निर्माला जोशी यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळंच फेथ क्रिकेट अकॅडमीची 10 एकर जमीनही या बेकायदेशीर संपत्तीच्या यादीत असल्याचं आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे. या जमिनीची किंमत 10 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. यासंदर्भात अकॅडमीला नोटीस पाठवून व्यवहारासंदर्भातील माहिती मागवली जाईल. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास ही जमीनही ताब्यात घेतली जाईल.
कुठे कुठे आहे संपत्ती ?
100 वेगवेगळ्या संपत्तीत प्रामुख्यानं 220 एकर शेतजमीन, फ्लॅट, घरांबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या जमिनीच्या तुकड्यांचाही समावेश आहे. या संपत्तीचे एकूण 100 कोटी रुपये आहे. एका कंपनीतील 40 वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती असून त्यापैकी 10 आईवडिलांच्या नावे, नोकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे 10 ठिकाणी संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. या संपत्तीमधील जमिनींचा व्यवहार रायसेन, सीहोर आणि मंडला येथील आहे. मंडला येथील कान्हा राष्ट्रीय उद्यानात रिसॉर्ट बनवल्या संदर्भात माहितीदेखील समोर आली आहे. 4 कोटींची विमा पॉलिसी या दोघांच्या नावे आहे. अरविंद आणि टीनू यांनी उच्च न्यायालयात 6 वेळा याचिका दाखल केल्यात मात्र प्रत्येक वेळी कोर्टानं त्या रद्द केल्या आहेत.