कोलकाता : वृत्तसंस्था –पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेच्या हातात भारतीय जनता पार्टीचा झेंडा दाखवल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. बीजेपी नेता आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी यावर नाराजी व्यक्त केली आणि नागरिकत्व कायद्यावर आपल्याच पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत भाजपातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून आपल्या पक्षाच्या भूमिकेवर टीका करताना चंद्र कुमार बोस म्हणाले, भाजपाने सीएएमध्ये बदल केले नाही त्यांना भाजपात राहण्याच्या आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागेल. नेताजींच्या हातात भाजपाचा झेंडा असलेला फोटो पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील आहे. आता तो संपूर्ण बंगालमध्ये वेगाने शेअर केला जात आहे. बंगाल भाजपाचे उपाध्यक्ष चंद्र कुमार बोस यांनी म्हटले की, नेताजी सुभाषचंद्र बोस निश्चित एक राजकीय व्यक्ती होते, परंतु पक्षीय राजकारणात नव्हते. मला वाटत नाही की सध्या कोणताही राजकीय पक्ष नेताजींशी संबंध सांगण्याच्या लायक आहे.
नेताजींच्या प्रतिमेत पक्षाचा झेंडा अयोग्य
चंद्र कुमार बोस यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधताना म्हटले की, त्यांच्या प्रतिमेत पार्टीचा झेंडा लावणे अयोग्य आहे आणि मी त्याचा निषेध करतो. मला वाटते की भाजपाचे राज्य अध्यक्ष दिलीप घोष यांनी यात ताबडतोब लक्ष घातले पाहिजे.सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी नागरिकत्व कायद्यावरून निर्माण झालेल्या भितीच्या वातावरणावरही चिंता व्यक्त केली होती. चंद्र बोस यांनी मोदी सरकारला या कायद्यांतर्गत मुस्लिम नागरिकांनाही नागरिकत्व देण्याचा आग्रह केला होता. बोस यांनी म्हटले होते की, मी काही साध्या दुरूस्त्यांसह सीएएचे समर्थन करतो. महात्मा गांधी यांनी म्हटले होते की, आपण आपल्या शेजारील राष्ट्रांनी सतावलेल्या लोकांना आसरा दिला पाहिजे. याबाबतीत गांधीजींनी कोणत्याही धर्माचा उल्लेख केला नव्हता. त्यांनी सर्व पीडित लोकांचा उल्लेख केला होता. गांधीजींच्या पत्रांचे अनुकरण करावे लागेल, नंतर त्यांनी जे काही म्हटले होते त्याचे आपल्याला अनुकरण करावे लागेल.
सीएएमध्ये दुरूस्तीची आवश्यकता – बोस
त्यांनी म्हटले की, जर भारत सरकारने सीएएमध्ये दुरूस्ती करून पीडित व्यक्तींना भारतात नागरिकत्व देण्याचा विचार केला तर विरोधी पक्षांच्या मोहिमेला काही क्षणात नष्ट करता येईल. सीएएबाबतच्या काही गोष्टींवर त्यांनी म्हटले, गृहमंत्री सतत म्हणतात की सीएएमध्ये धर्म नाही. जर हे कोणत्याही धर्मावर आधारित नाही तर आपल्याला यामध्ये पारदर्शक आणि विशेष होण्याची गरज आहे. कारण याबाबतीत अनेक शंका आहेत. बोस यांनी म्हटले की, त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करताना म्हटले होते की, ते नेताजींच्या विचारधारेवर राजकारण करतील. ते म्हणाले, 2016 मध्ये मी जेव्हा भाजपामध्ये दाखल झालो तेव्हा नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर माझी चर्चा झाली होती की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारधारेवर मी राजकारण करेन. त्यांची विचारधारा सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष होती. मी म्हटले होते की, नेताजींच्या विचाराच्या विरूद्ध काही झाले तर मला भाजपामधील माझ्या राहण्यावर पुनर्विचार करावा लागेल.
सीएएवर केंद्राने स्पष्टीकरण द्यावे
ते म्हणाले, सरकारला या मुद्द्यावर स्पष्टीकरण जारी करावे लागेल, ज्यामुळे लोकांना समजण्यास सोपे जाईल. नागरिकता अधिनियमाचा उद्देश बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगानिस्तानमधून 31 डिसेंबर 2014 ला किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या हिंदू, जैन, ईसाइ, शिख, बौद्ध आणि पारसी धर्माच्या लोकांना भारतीय नागरिकता प्रदान करणे आहे. बोस यांनी म्हटले, आता मुस्लिमांचे काय होणार जे या तारखेच्या अगोदर भारतात आले होते ? याबात संभ्रम आहे. केंद्राने हा संभ्रम दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.
Visit : bahujannama.com