अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – कर्जत तालुक्यातील दलितवस्ती सुधार योजनेवर खर्च न झाल्याने जबाबदार अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी, यासह विविध मागण्यांसाठी भारिपच्या वतीने कर्जत पंचायत समितीसमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन गटविकास अधिकाऱ्यांनी ज़बाबदार अधिकाऱ्यास नोटीस दिली व इतर मागण्यांबाबत लेखी दिल्यानंतर आज मागे घेण्यात आले.
तालुक्यात सन २००३ पासून दलित वस्ती योजनेतील निधी विविध ग्रामपंचायती खर्चच करत नसल्याची तक्रार येथील कार्यकर्ते अंकुशराव भैलुमे हे अनेक वषांर्पासून करत असून, या आंदोलनाला प्रशासन पत्रे देऊन पुढे ढकलत आहेत. या प्रश्नावर भारिप- बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष अंकुश भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली दि. २५ फेब्रु. पासून कर्जत पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दलित वस्ती सुधार योजनेतून कुळधरण येथे केलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली असता, बांधकामचे अभियंता कानगुडे यांनी या कामाची पाहणी करून काम निकृष्ट झाल्याचे आंदोलकांना सांगितले. हे काम दुरुस्त करण्यात यावे, असे सुचवून निकृष्ट कामे करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. याशिवाय रमाई आवास योजनेंतर्गत फेर सर्व्हे करण्यात यावा, तालुक्यातील १५ टक्के १० टक्के व ३ टक्के निधीबाबत सर्वच ग्रामपंचायतींची चौकशी करण्यात यावी, विकासकामात दलित वा हरिजन, हा शब्द वापरू नये, अशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात याव्यात, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.
गटविकास अधिकाऱ्यांनी ज़बाबदार अधिकाऱ्यास नोटीस दिली व इतर मागण्यांबाबत लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दुपारी पंचायत समितीच्या सभापती पुष्पा शेळके उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गुंड, बाबासाहेब गांगर्डे, हेमंत मोरे, ज्योती शिंदे, साधना कदम, अश्विनी कानगुडे आदींसह गटविकास अधिकारी मुकुंद पाटील उपस्थित होते. भारिपचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी आंदोलकांची भेट घेतली. महेश आखाडे, रोहिदास धावडे, कुंडलिक गंगावणे, कैलास गजरमल, विश्वास तनपुरे, अनिल गजरमल, आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान, भारिपचे ज़िल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी बोलताना कार्यकर्त्यांच्या माफक अपेक्षा असतात व त्या पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.