नवी दिल्ली : वृत्तसंस्था- सुप्रीम कोर्टाने 2002 मध्ये गुजरातच्या गोध्रानंतर उसळलेल्या दंगलीशी संबंधीत प्रकरणातील 17 दोषींना सशर्त जामीन मंजूर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोर्टाने ज्या 17 दोषींना जामीन दिला आहे, त्या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णयात म्हटले की, यापैकी कुणीही गुजरातच्या सीमेमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. कोर्टाने म्हटले की, जोपर्यंत या लोकांच्या अपीलावर सुप्रीम कोर्ट अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत ते इंदोर आणि जबलपुरमध्ये राहतील. कोर्टाने घातलेल्या अन्य अटींमध्ये समाजाची सेवा करण्याचीही अट आहे.
दोषींची वेगवेगळ्या गटात विभागणी
कोर्टाने दोषींना वेगवेगळ्या गटात विभागले आहे. एका गटाला इंदोरला आणि एका गटाला जबलपुरला पाठवले आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व दोषींना सांगितले की, जामिनावर असताना त्यांनी सामाजिक आणि धार्मिक काम करावे. कोर्टाने इंदोर आणि जबलपुरमधील न्याय अधिकार्यांना सांगितले की, त्यांनी जामीनावर असलेल्या दोषींसाठी अध्यात्मिक आणि सामाजिक कार्य ठरवावे.
कोर्टाने अधिकार्यांना त्यांच्या उपजिविकेसाठी सुद्धा काम करण्यास सांगितले आहे. तसेच राज्य कायदा सेवा प्राधिकरणाला अंमलबजावणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. कोर्टाने म्हटले की, जामिनावर असताना त्यांच्या वर्तणूकीचा अहवाल द्यावा. दरम्यान, गोध्रानंतर उसळलेल्या दंगलीत 33 लोकांचा मृत्यू झाला होता.
Visit : bahujannama.com