औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव करून निवडून आलेले एमआयएम पक्षाचे विजयी खासदार इम्तियाज जलील यांच्या विजयावर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक लढविलेल्या एका उमेदवारानेच ही याचिका दाखल केली आहे. या निवडणूक याचिकेवर १३ जूलै रोजी प्राथमिक सुनवाणी कऱण्यात येणार आहे.
कोणी दाखल केली याचिका ?
लोकसभा निवडणूकीत औरंगाबाद मतदारसंघात शेख नदीम, शेख करीम यांनी बहुजन महापार्टी पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. त्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.
नदीम यांना ०.१ टक्का मते
शेख नदीम शेख करीम यांना निवडणूकीत १२१० मते मिळाली. तर जलील हे चंद्रकांत खैरे यांच्यापेक्षा ४४९२ मतांनी विजयी झाले आहेत. पराभूत उमेदवार नदीम यांना ०.१ टक्का मते मिळाली आहेत.
काय आहे आक्षेप ?
शेख नदीम शेख करीम यांनी जलील यांच्यावर आक्षेप घेत त्यांच्या निवडीविरोधात ही याचिका दाखल केली आहे. त्यात इम्तियाज जलील यांचा पक्ष एआय़एमआयएम चे अध्यक्ष असदूद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आणि दलितांच्या नावावर मते मागितली आहे. तसेच जलील यांनी निवडणूकीदरम्यान ८२ हजार रुपये रोख खर्च केला. निवडणूक नियम ८७ नुसार निवडणूकीचा खर्च खात्यातूनच करावा लागतो.
अल्पवयीन मुलीची सीडी करून मतदानाआधी सोशल मिडीयावर प्रसारित
मतदानाआधी एका अल्पवयीन मुलीची मतदान करण्याचे आवाहन करणारी सीडी तयार करून ती सोशल मिडीयावर प्रसारित करण्यात आली. ही सीडी आफताब खान याने तयार केली असून तो एमआयएमचा कार्यकर्ता आहे. यामध्ये एमआयएमला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मशिदींमधून प्रचार
प्रचारादरम्यान एमआयएमचे प्रमुख असदूद्दीन ओवेसी यांनी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशी भाषणे केली आहेत. याची पुष्टी करण्यासाठी काही सीडी सादर करण्यात आल्या आहेत. तर मशिदींमधूनही प्रचार केला गेला आहे. असा आरोप करत त्याची छायाचित्रेही सादर करण्यात आली आहेत.