सांगली : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह एकत्रित लढल्यास युती सरकारला सत्तेतून बेदखल करू शकते, यासाठी ठाकरे यांना बरोबर घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. तसेच आमदार बच्चू कडू, वंचित आघाडीलाही बरोबर घेण्याचा विचार सुरु आहे. वंचितच्या नेत्यांनी शांत डोक्याने विचार करुन निर्णय घेण्याची वेळ आली आहे. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, “आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडी सोबत जाण्याची तयारी आहे. पण याबाबत त्यांनी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. निर्णय न घेतल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. येत्या १ ऑगस्ट नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेईल.
असा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे तसेच महाआघाडी न झाल्यास “स्वाभिमानी’चे ४९ उमेदवार तयार आहेत. लोकसभा निवडणुकीत “वंचित’मुळे नुकसान झाले. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीत सामील व्हावे.” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भाजपाचा लोकसभा निवडणुकीतील विजय हा ईव्हीएमचा आहे. देशात काही ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणूक झाली तेथे भाजपचा पराभव झाला आहे. अनेक जबाबदार पक्ष, नेते, मतदार याबाबत संशय व्यक्त करीत आहेत. काहीजण बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करतात. पण याकडे दुर्लक्ष केले जाते. निवडणूक आयोगातील अनेक अधिकारी माहिती सांगितली तर आमच्या जिवाला धोका असल्याचे जाहीरपणे सांगतात.
दरम्यान, महाराष्ट्रात मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मशीन परफेक्ट काम करते. कारण त्यांनी ४२ जागांचा वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. याविरोधात बामसेफ आंदोलन करीत आहेच. पण आता विविध सामाजिक, राजकीय संघटनांना घेवून याविरोधात रान पेटविले जाणार आहे. अशी माहितीही त्यांनी दिली.