परभणी : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याच्या कारणावरुन शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा पाठवला आहे. तसेच राजीनाम्यासोबत एक पत्रसुद्धा पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. त्यामुळे परभणी जिल्हात शिवसेना आणि राष्ट्रवादी वाद चव्हाट्यावर आला आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात संजय जाधव म्हणाले, ‘परभणीच्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागच्यावेळी राष्ट्रवादीचा आमदार नसतानाही प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं होत. म्हणून शिवसैनिक नाराज झाले होते. तेव्हा पुढच्यावेळी आपणास संधी मिळेल असे सांगून आपण शिवसैनिकांची मनधरणी केलेली. पण आता पुन्हा जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणामुळे शिवसेनेची गळचेपी होत असून आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा देत असल्याचं’ त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं.
‘मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. राष्ट्रवादीचा आमदार नसताना त्यांना सत्तेची पद मिळतात. मात्र, शिवसैनिकांना न्याय मिळत नाही. शिवसैनिकांनी मला जर न्याय मिळवून देता येत नसेल तर माझी खासदारकी काय कामाची?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बाजार समितीवर राष्ट्रवादीचे प्रशासकीय मंडळ दुसऱ्यांदा नियुक्त करण्यात आल्याचं मला शल्य आहे, म्हणून मी राजीनामा देत असून शिवसैनिकांना न्याय मिळावा’, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.
दरम्यान, जाधव यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तर शिवसेनेनेही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे शिवसेनेचे काही नेते जाधव यांची समजूत काढत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. तर परभणी जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत समन्वय नसल्याचं दिसून आलं आहे.
संजय उर्फ बंडू जाधव कोण आहेत?
बंडू जाधव हे शिवसेनेचे जेष्ठ नेते असून २००९ ते २०१४ साली ते परभणीतून आमदार म्हणून निवडून आलेले. २०१४ साली त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांचा दारुण पराभव केलेला. या निवडणुकीत त्यांना ५ लाख ७८ हजार ४५५ मते मिळाली होती.