मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे चांगलेच पानिपत झाले त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना सादर केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे मी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पाठविला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतर्गत फेरबदलाचा निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचा आहे. एका वृत्त संस्थेशी बोलताना त्यांनी सांगितले कि यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार हे त्यांनाच आहेत. काँग्रेसचा पराभव झालेल्या राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे सादर करत पक्षांतर्गत फेरबदलास वाट मोकळी करण्याची भूमिकाही चव्हाण यांनी मांडली होती.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडचा बालेकिल्ला राखला होता पण यंदा मात्र काँग्रेसला महाराष्ट्रात अवघ्या एकाच जागेवर समाधान मानावे लागले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महाराष्ट्रातील चंद्रपुर येथील काँग्रेसची एकमेव जागा वाचवण्यात काँग्रेसला यश आले. निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सुरेश धानोरकर हे राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. चंद्रपुरात त्यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला.