नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि NDA ने दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावी जबाबदारी स्वीकारली आहे . मात्र निकालानंतर काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसला चांगलाच टोला लगावला आहे ते म्हणाले की, ‘भाजपाचा अभूतपूर्व विजय झालेला आहे. अशात मला असं वाटतं की देशाला एका चांगल्या, स्वच्छ प्रतिमा असलेल्या, बुद्धीमान विरोधी पक्षाची गरज आहे. यामुळेच लोकशाहीचा आदर राखला जाईल, मात्र सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचारी आणि मूर्ख आहे’ अशा पद्दतीने ट्वीट करत सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे.
तत्पूर्वी आज या पराभवामागील कारणांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक सुरु झाली आहे. यावेळी पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा कार्यकारिणीसमोर सादर केला आहे.