मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसापासून कला क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप वाढत आहे. त्याला कलाकारच सर्वस्वी जबाबदार आहेत. सरकारकडून मिळणारा निधी, विविध लाभ, राजाश्रय तसेच सरकारकडून मिळणारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कामे त्यांना हवी असतात. त्यामुळे सरकारी हस्तक्षेप कितीही वाढला तरी कलाकार गप्प राहाणेच पसंत करतात, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी केली आहे.
एक विशेष मुलाखतीत त्यांनी सरकारवर टीका केलीच पण कलाकारांच्या मिंधेपणाला तसेच त्यांच्या या स्थितीला तेच जबाबदार असल्याची बोचरी टीकाही केली. कलाकारांच्या मिंधेपणाचा फायदा सरकार उठवते. कलाकारांचे पंख छाटतात, त्यांचा आवाज बंद करतात. सरकारची हुकूमशाही मान्य करतात. सरकारविरोधात आवाज उठवायचा की सरकारविरोधात बोलायचे नाही, याचा पर्याय कलाकारांकडेच असतो.
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमधील माझे भाषण थांबवण्यात आले. त्यावेळी तिथे कला क्षेत्रातील मोठमोठे दिग्गज उपस्थित होते, पण भाषण थांबवणाऱयांना कोणी मध्येच रोखले नाही. याला काय म्हणायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.