जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – देशाचे संविधान बदलण्याची भूमिका आरएसएसने २०२४ मद्ये घेतली आहे. मात्र, संविधान का बदलायचे याबाबत आरएसएसने वक्तव्य केलेले नाही. यावरून हे स्पष्ट होते की, आरएसएसला मनुवादी संविधान या देशात आणायचे आहे. त्यामुळे आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणणे महत्वाचे आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
उद्या जर काँग्रेसकडे सत्ता गेली तर आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेसचा अजेंडा काय आहे ते काँग्रेसने जाहीर करावे. जोपर्यंत हा अजेंडा काँग्रेस देत नाही, तोपर्यंत महाआघाडीबाबत चर्चा होणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज दुपारी मुक्ताईनगर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, महाआघाडीसंदर्भात चार महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याबाबतचा अजेंडा काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही चर्चा थांबली आहे. निवडणुका लवकर असल्याने काँग्रेसने हा अजेंडा लवकर देण्याची गरज आहे. तरच बोलणी पुढे जाईल. आता आम्ही ज्या मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत, त्या मतदारसंघातील एकही उमेदवार मागे घेतला जाणार नाही. उरलेल्या मतदारसंघावर चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.