पुणे : बहुजननामा ऑनलाईन – समाजातील अनेक विद्यार्थ्यांची हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते त्याच गोष्टीचा विचार करून शिवसमर्थ प्रतिष्ठाणच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सिंहगड रस्ता परिसरातील होतकरू तसेच गरजू विद्यार्थ्यांना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठाणच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून अविरतपणे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून असे उपक्रम राबवले जातात. सेवा सहयोग आणि निरामय संस्थेच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपूरे यांच्या हस्ते हे साहित्य वाटप नुकतेच करण्यात आले. अभ्यासाठी लागणारे साहित्य यामध्ये वही, दप्तर, राष्ट्रहित प्रबोधनपर पुस्तकं व इतर शालेय साहित्याचा समावेश यामध्ये होता.
मुलांच्या चेहऱ्यावर साहित्य मिळाल्यानंतर येणारे हसू हीच आमच्या कामाची पावती असल्याची भावना नगरसेविका नागपूरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. सेवा सहयोग आणि निरामय संस्थेचे शिक्षक तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.