मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप, शिवेसेना आणि मित्रपक्षांची महायुती अभेद्य असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात आगामी निवडणूका या महायुतीतच लढल्या जाणार असा दावाही त्यांनी केला. त्यानंतर या महायुतीतील मित्रपक्षांनी आता जागा मागण्यास सुरुवात केली आहे. युतीतील मित्रपक्षांनी एकूण ४६ जागांची मागणी केली आहे. त्यामुळे आता सेना-भाजपसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
राज्यात विधानसभा निवडणूकांचं सध्या वारं आहे. या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सेना भाजप आणि विरोधी पक्षांनी आपापल्या यात्रा काढल्या आहेत. मतदारांना आकर्षित करताना सेना-भाजपमध्ये ५०-५० चा फॉर्म्यूला ठरल्याचं बोललं जात आहे. तर त्यातच मित्रपक्षांकडूनही जागांची मागणी केली जात आहे.
शिवसंग्राम पक्षाचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या १२ जागांवर आपला दावा केला. तर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीसुद्धा किमान १२ जागांची मागणी केली आहे. त्यात राज्यातून केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री झालेले रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही महायुतीत आपल्याला किमान १० जागा मिळाव्यात अशी मागणी करणार आहेत. त्यासोबतच कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयतक्रांती संघटनेने विधानसभा निवडणूकीत १० जागांची मागणी केली आहे. त्यामुळे मित्रपक्षांनी मागणी केलेल्या एकूण जागांची संख्या एकूण ४६ वर गेली आहे.
विधानसभा निवडणूकीत महायुती होणार हे निश्चित असले तरी मित्रपक्षांकडून अव्वाच्या सव्वा जागांची मागणी केली जात असल्याने भाजप-सेना युतीसमोर पेच वाढला आहे. परंतु आता महायुतीमध्ये मित्रपक्षांना किती जागा दिल्या जाणार याकडे मात्र महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.