बहुजननामा ऑनलाईन टीम – भाजप विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय खेचून आणण्यासाठी जोरदार तयारीत आहे. या मैदानात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले असून महाजनादेश यात्रेद्वारे ते लोकांशी संवाद साधत आहेत. याच दरम्यान आगामी निवडणुकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मुख्यमंत्रिपद जाईल, अशा चर्चेना जोर आला आहे. यावर खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.
“चंद्रकांत पाटील हे काय म्हणाले याच्याशी माझा काहीच संबंध नाही. भाजप पक्षात निवडून आलेले आमदार आणि केंद्रीय नेतृत्व असलेलेच मुख्यमंत्री ठरवतात. सध्या मी मुख्यमंत्री आहे, तुमची कृपा व आशीर्वाद असेल तर मी पुन्हा मुख्यमंत्री होईल. चंद्रकांत पाटील आतच प्रदेशाध्यक्ष झाले आहेत त्यांना या पदाचा आनंद घेऊ द्या.” असे सांगत देवेंद फडणवीस यांनी आपण पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसण्यास सज्ज आहोत हे सुचवले आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने चंद्रकांत पाटील यांचे सध्या पक्षातील वजन वाढल्याचे बोलले जात आहे. अशातच पत्रकारांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाविषयी विचारले असता, ‘मला मुखमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा नाही’ असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. तसेच पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारत असतो असे सांगत मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना त्यांनी विराम दिला.