बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी ( Arnav Goswami) यांना सकाळीच पोलिसांकडून अटक ( Arrest) करण्यात आली आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक ( Anvay Naik) आत्महत्या प्रकरणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रायगड पोलिसांकडून करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या वेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अर्णब गोस्वामी यांनी पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर कंगनाने ( Kangna) ठाकरे सरकारवर ( Thackeray government) निशाणा साधला आहे.
काय म्हणाली कंगना
कंगनाकडून एक व्हिडिओ ट्विट ( Tweet) करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये कंगनाने तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? अशी विचारणा कंगनाने ठाकरे सरकारला केली आहे. तिने म्हटलं आहे, की “मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वांमी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात?”. असे प्रश्न उपस्थित केले आहेत. कंगनाने पुन्हा एकदा सोनियासेना म्हणून संबोधले आहे.
कंगना पुढे म्हणाली, “सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? ही तोंडं वाढतच जाणार आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील,” असं म्हटलं आहे. “पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो. पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना…वडिलांच्या पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना..सोनियासेना म्हटल्यावर राग येतो का…तुम्ही आहात सोनियासेना,”
अर्णब गोस्वामी यांना अटक कशासाठी ?
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आले होते. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्याकडून पण हा आरोप करण्यात आला होता. अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
रिपब्लिक TV चा ( Republic TV) दावा
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिककडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिककडून दावा करण्यात आला आहे. तसेच अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही बोललं जात आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केस संदर्भात ही अटक केले असल्याचे रिपब्लिक TV ने दावा केला आहे. अर्णब गोस्वांमी यांच्याकडून १० पोलिस कर्मचारी घरात घुसले आणि घराबाहेर येण्यासाठी जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आली असा दावा केला आहे. तसेच मुंबई पोलिसांनी रिपब्लिकचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी ( Niranjan Narayanaswamy) आणि संजय पाठक ( Sanjay Pathak) यांना घरात जाण्यापासून रोखले. अटकेची कारवाई करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांच्या घराबाहेर पोलिसांची ८ वाहनं आणि ४० ते ५० कर्मचारी उपस्थित होते असा दावा करण्यात आला आहे. निरंजन यांना रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आले असा सुद्धा रिपब्लिककडून दावा करण्यात आला.