नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – आगमी लोकसभेत काँग्रेस सत्तेत आल्यास ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट’ (आप्सपा ) कायदा रद्द करणार नाही, तर त्याचा दुरुपयोग रोखणार आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले. भाजपला हा मुद्दा उचलण्याचा कुठलाही अधिकार नाही. कारण, भाजपाने स्वत:च तीन राज्यातून आप्सपा कायदा हटवलेला आहे आणि निवडणुकीनंतर अरुणाचल प्रदेशातूनही हा कायदा हटविण्याचे आश्वासन देत आहे, असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते नागपुरात आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.यावेळी खरगे यांनी ‘काँग्रेस क्रॉस होल्डिंग ऑफ मीडिया व्यवस्थेलाही संपवणार असल्याचे सांगितले. देशद्रोहाच्या कायद्याबाबत पक्षाचे धोरण स्पष्ट करताना ते म्हणाले, या कायद्याच्या नावावर अनावश्यक पद्धतीने लोकांना त्रस्त केले जात आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. परंतु त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचे स्वातंत्र्य संपवण्याचा प्रयत्न सध्या होताना दिसतं आहे. काँग्रेसला देशद्रोहाच्या कायद्याचा चुकीच्या वापराबद्दल आक्षेप आहे. भाजपा सरकार स्वत:ला प्रामाणिक आणि दुसऱ्यांना चोर ,देशद्रोही मानत आहे. ही मानसिकता योग्य नाही. राष्ट्रवादाच्या नावाखाली देशद्रोह कायद्याचा चुकीचा वापर होऊ नये. काँग्रेस पक्ष देशद्रोह कायद्यासंदर्भात अधिक स्पष्टता आणू इच्छिते, कायदा बदलवण्याचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.