पुणे : बहुजननामा ऑनलाइन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आपल्याला एकत्र आणले असून त्यामुळे आता आंबेडकर स्वीकारायचे की गोळवलकर हे आता देशाने ठरवायचे आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. तसेच सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यांना विरोध करणारी पत्रे नागरिकांनी सरकारला लिहावीत. तसेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा लागू करणार नाही, असा ठराव महाराष्ट्र विधानसभेने करावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केली आहे.
महाराष्ट्र स्मारक निधीच्या वतीने सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन या विषयावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असता त्यावेळी डॉ. सप्तर्षी बोलत होते. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ या महासभेचे आयोजन गुरुवारी सारसबाग जवळ करण्यात आले होते. तसेच जितेंद्र आव्हाड हेही तिथे उपस्थित होते. त्यांनी म्हटले की, हिटलरने जे जर्मनीत घडवले तेच सध्या आपल्या देशात घडवण्याचा प्रयत्न होत आहे. संविधानावरील हल्ल्याविरोधात महात्मा गांधी यांनी दाखविलेल्या अहिंसेच्या मार्गानेच पुढे जावे लागणार आहे. इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असेही आव्हाड म्हणाले.
सत्याग्रही मासिकाच्या नागरिकत्व कायदा आणि २९ व्या वर्षांरंभ विशेष अंकाचे प्रकाशन तसेच शेखर सोनाळकर यांनी लिहिलेल्या ‘एनआरसी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना सरकार आपल्याकडे कागद मागत असेल तर त्यांना मध्यावधी निवडणूक घेऊन जनादेशाचा कागद मागा, असे डॉ. सप्तर्षी म्हणाले.