बहुजननामा ऑनलाईन – “याविषयीचा पेपर मी आत्ताच फोडणार नाही. जनता देईल ती जबाबदारी घेणार” असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी असे उत्तर दिले.राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राजकीय वातावरणात ढवळून निघाले आहे.
ठिकठिकाणी नेत्यांच्या यात्रा आणि सभा भरत आहेत, तर पक्षांतराने अनेकांना दणके बसत आहेत. भाजप आणि शिवसेनेत आता जागावाटपाबद्दल चर्चा सुरू झालीय. या दरम्यान शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना उपमुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत असल्याच्या चर्चा वाढत आहेत. दरम्यान आदित्य यांनी सुरु केलेल्या जनयात्रेत खासदार संजय राऊत यांनी आदित्य यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजक्ट केलं होतं. नंतर आदित्य यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याचीही चर्चा होती. मात्र त्यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे उपमुख्यमंत्रीपदाच रहस्य रहस्यच राहणार असल्याचे दिसत आहे.
भाजप आणि शिवसेनेतल्या जागावाटपाच्या चर्चेवरही आदित्य यांनी उत्तर देत भूमिका स्पष्ट केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात युती बद्दल चर्चा झाली असून तेच याबाबत चर्चा करतील. आम्ही पक्ष किंवा सरकार या नात्याने नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत असू. कर्जमाफीच नाही तर कर्जमुक्ती हे आमचे उद्दिष्ट आहे. पीक विमा योजनेसाठीही आम्ही लढत आहोत. याशिवाय आम्हाला कर्ज मुक्ती, विकास, राम मंदिरासारखे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. पण विरोधी पक्षाला जर प्रश्न उचलायचे असतील तर त्यांनी जनतेचे प्रश्न उचलावेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.