बहुजननामा ऑनलाईन टीम : एखादी व्यक्ती त्रास देत असेल किंवा मानसिक छळ देत असेल म्हणून महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्याचे यापूर्वी आपण ऐकले, वाचले असणार. पण औरंगाबाद शहरात महिलेने चक्क रस्त्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास व्हावा म्हणून रस्ता आपली अडवणूक करत असल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
संध्या घोळवे-मुंडे असे तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्या फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करतात. मुंडे कामानिमित्त रोज औरंगाबाद ते फुलंब्री प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे त्या त्रस्त झाल्या आहेत. त्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्यांनी पोलीसांत धाव घेतली आहे.
मुंडे यांनी तक्रारीत हा रस्ता आपल्याला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास देण्याच्या उद्देशाने धक्काबुक्की व अडवणूक करत असल्याचे म्हटले आहे. हा रस्ता सुधारेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे होताना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस जीवघेणा बनत चालला असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. इतकच नव्हे तर हा रस्ता आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो, असे सांगत मुंडे यांनी गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.