नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांना एका मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ५ अतिरेक्यांना एका चकमकीत अटक केली आहे. त्यांच्याकडे काही हत्यारे आणि दस्तऐवज मिळाले आहेत. पाच पैकी दोन अतिरेकी पंजाबचे असून तीन अतिरेकी कश्मीरमधील आहेत. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल आणि अतिरेकी यांच्यात शकरपूर परिसरात चकमक उडाली. अतिरेक्यांचा कट उधळून लावत पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.
स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाहा यांनी सांगितले की, काही अतिरेकी शकरपूर परिसरात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी त्या भागात छापे घातले. अतिरेक्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही त्याला प्रतिउत्तर देत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. नार्को टेरिझमसाठी या अतिरेक्यांना आयएसआयचे समर्थन मिळाले होते.
ते कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत, याची अजून माहिती मिळाली नसून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. त्यांचा नेमका उद्देश काय होता. ते काम करणार होते, याची माहिती घेतली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांचे मोठे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे दिल्लीची कोंडी झाली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन मोठे कांड करण्याचा या अतिरेक्यांचा विचार होता का याची तपासणी केली जात आहे.