बहुजननामा ऑनलाइन टीम – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ( Brihanmumbai Municipal Corporation) भाजपने रणशिंग फुंकले आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा सर्वांत मोठा गड असलेल्या मुंबई महापालिकेवर 2022 मध्ये भाजपचाच भगवा फडकावयाचा, (BJP’s Ashish Shelar attacks Shiv Sena)असा चंगच भाजपच्या नेत्यांनी बांधला आहे. यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचीही बैठक झाली, या बैठकीत महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकेल अन् पुढचा महापौर भाजपचा असेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. परंतु फडणवीसांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत ( shiv-sena-sanjay-raut) यांनीही प्रहार केला.
पण आता शुद्ध भगवा कोणाचा या मुद्द्यावरून सेना-भाजप यांच्यात कुरघोडी सुरू आहे. तुमच्या 100 पिढ्या आल्या तरी मुंबई पालिकेवरील भगवा उतरवणं सोडा, पण हात लावणेही शक्य नाही, असे सेनेने म्हटले आहे. त्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार (bjp-ashish-shelar) यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. शेलारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 105 हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला, कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली, याकूबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला, ज्यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला त्यांच्यासोबत सत्तेत बसलात, तेव्हाच भगव्याचा रंग तुम्हीच फिका केलात, भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात असे शेलार यांनी म्हटले आहे. तसेच भ्रष्टाचाराला कंटाळून आता मुंबईकरच आता महापालिकेवर पारदर्शक कारभाराची, विकासाची गुढी उभारतील, गुढीला शुद्ध भगव्याची झालर चढवतील, तुम्ही अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा, मुंबईकरांना आव्हान देताय, पण मुंबईकरच आता करून दाखवतील, असा चिमटा शेलारांनी शिवसेनेला काढला आहे.
सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा
मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा कुणाला आठवली असेल, तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल, मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भाजपने असे ठरवले आहे की, यावेळी मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा आता हा शुद्ध भगवा म्हणजे काय प्रकार आहे. बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे. बिहारच्या निवडणुका भाजपने जिंकल्या असल्या तरी त्या जिंकताना काय घाम फुटला हे देशाने पाहिले आहे. भाजप शिवसेनेसोबत नव्हता तेव्हापासून मुंबई महापालिकेवर भगवा फडकलेलाच आहे. हा भगवा शुद्ध, तेजस्वी आणि प्रभावी आहे. यापेक्षा वेगळा भगवा अस्तित्वात आहे असे महाराष्ट्राला वाटत नाही. हा भगवा छत्रपती शिवरायांचाच आहे. आता भाजपमध्ये कुणी प्रतिशिवाजी निर्माण झाले असतील आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र भगवा निर्माण केला असेल, तर तो त्यांचा प्रश्न असा निशाणा शिवसेनेने भाजपवर साधला आहे.