पुणे, बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या जिल्ह्यास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी हा टोला लगावला. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला गृहखाते दिले तर, ते मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावतील, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर त्यांचे सरकार असताना असे कोणतेही वक्तव्य केले नव्हते. १०५ जागा मिळाल्यावरही त्यांचे सरकार बनू शकले नाही. याचे त्यांना दुःख आहे, असे अजित पवार म्हणाले.
अधिवेशन चालू असतानाही त्यांनी विधान केले होते, ज्यावर ठाकरे यांनी उत्तर दिले होते. त्यावेळी त्यांनी ‘चोराच्या मनात चांदण्या’ आणि ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’ अशा म्हणींचा वापर केला होता. तसेच यावेळी पक्ष देईल ते पद स्वीकारणार असून राष्ट्रवादीला महत्वाचे खाते मिळू शकते, असेही ते म्हणाले.
कर्जमाफीचे श्रेय घेण्यावरून कोणताही वाद नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत मुंबईत बोलणे झाले असून, तीनही पक्षांचा निर्णय ठरला आहे, असे पवार म्हणाले. महाविकास आघाडीच्या स्थानिक पक्षप्रमुखांकडून निर्णय झाला नाही तर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असेही पवार म्हणाले.