मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव मिळाल्यानंतर भाजपने प्रत्येक विभागाचा आढावा घ्यायला सुरुवात केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हा आढावा घेत आहे. आज त्यांनी अहमदनगरमधील निवडणुकीचा आढावा घेतला. या बैठकीला भाजप नेते उपस्थित असून राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव कर्डीले, राम शिंदे, मोनिका राजळे हेही बैठकीला उपस्थित होते. मिळालेल्या पराभवाला राम शिंदे आणि शिवाजी कर्डीले यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांना जबाबदार ठरवले असून त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही, असेही ते म्हणाले.
राम शिंदे यांनी विखे पाटीलांवर आक्षेप घेत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केले, असे म्हटले आहे. प्रचारादरम्यान भाषणात त्यांनी समोरच्या उमेदवाराला विरोध केलाच नाही. उलट ते विरोध उमेदवाराला नसून विरोध घड्याळाला आहे, असे विखेंनी म्हटले. प्रचारादरम्यान राम शिंदेंच्या व्यासपीठावर विखे पाटीलांचे कार्यकर्ते असताना सुजय विखे पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या बाजूने मदत करत होते.
विरोधकांच्या निवडणुकीदरम्यान भेटीगाठी घेण्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊन शिंदे यांच्या मतांवर परिणाम झाला. भाजपात असूनही पक्षात न मिसळता स्वतःचा वेगळा गट करून शिंदे यांचा पराभव होईल अशी व्यवस्था करणे. ही कारणे राम शिंदे यांनी दिली.
विखे पाटीलांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर नाराजी राहील, असे शिवाजीराव कर्डीले म्हणाले. अहमदनगरमध्ये ज्या प्रकारे आम्ही जादू दाखवली त्याप्रकारे जिल्हा परिषदेमध्येही जादू दाखवू असेही कर्डीले यांनी म्हटले. राज्यात भाजपची सत्ता आली असती तर विखे पाटीलांच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला असता, असा टोमणाही कर्डीले यांनी मारला.