विशाखापट्टणम : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील आरआर वेंकटपुरम गावात गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर इंडस्ट्रीत रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली. यामुळे एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. तरजवळपास एक हजार पेक्षा अधिकजण यामुळे आजारी पडले आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी (डीएमएचओ) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विषारी वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांमध्ये जळजळ व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमक विभागाचे वाहन, रुग्णवाहिका व पोलीस दाखल झाले आहेत. आरआर वेंकटपुरममधील एलजी पॉलिमर कंपनीतून विषारी वायू गळती झाली. ज्यामुळे आसपासच्या तीन किलोमीटर अंतरावरील परिसरावर याचा परिणाम जाणवला.
ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी वी विनय चंद हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांनी सांगितले की, काहीजणांना श्वसनास त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन दिला जात आहे.