बीड : बहुजननामा ऑनलाइन – धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आता रस्त्यावरची लढाई लढण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शासनावर दबाव आणावा लागेल. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर काही संघटनांकडून आरक्षणाच्या नावाखाली समाजाची सुपारी घेऊन दिशाभूल करण्याचे काम होत असल्याचा गौप्यस्फोट पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केला. येथील जैन भवनात धनगर आरक्षण आक्रोश मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, शिवाजी राऊत, बापूसाहेब शिंदे, हरीष खुजे, गणपत काकडे, देविदास शेंडगे, अमर ढोणे, कल्याण आबूज, किशोर पिंगळे, गणेश थोरात, जिल्हाध्यक्ष विकास ढोरमारे आदी उपस्थित होते.
डॉ. महात्मे म्हणाले, आरक्षण कसे मिळवायचे हे मराठा समाजाकडून शिकले पाहिजे. ज्या प्रकारे मराठा समाजाचे मूक मोर्चे लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात निघाले. नागरिक पक्ष, संघटना, विचार बाजूला ठेऊन आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र आले, त्याचप्रमाणे धनगर समाजाने देखील लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरायला पाहिजे. या परिस्थितीत अनेक धनगर संघटनांकडून सुपारी घेऊन समाजाची दिशाभूल केली जात आहे. भारतीय जनता पार्टीविषयी अपप्रचार केला जात आहे. मात्र, हे सरकार आल्यापासून संख्या दाखवली तरच सरकारला कळेल की आपली ताकद किती आहे व सरकारवर दबाव आणता येईल. याचसाठी येत्या २० जानेवारी रोजी वाशिम येथे धनगर समाज संघर्ष समितीसह इतर संघटनाच्या वतीने धनगर आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व समाज बांधवांनी विचार, पक्ष, संघटना बाजूला ठेऊन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी महात्मे यांनी केले.
निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्यासाठी पेटून उठले पाहिजे. भीक मागून काही मिळत नाही तर हिसकावून घ्यावे लागते. कारण ‘आता नाही तर कधीच नाही’ त्यामुळे एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी यावेळी केले. कार्यक्र मास विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.