यवतमाळ : बहुजननामा ऑनलाइन – मनुवाद्यांचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आणि वंचित बहुजन घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २० ते २२ सामाजिक संघटना एका झेंड्याखाली आणून वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली.
‘अकोला पॅटर्न’ म्हणून नावारूपास आलेला हा पॅटर्न राज्यभरात राबविण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रभारी निरीक्षक तथा अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड यांनी दिली.
येथील विश्रामगृहात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती. तेव्हा भिरड यांनी ही माहिती दिली. २० मे २०१८ रोजी पंढरपूरला धनगर समाजाचा मेळावा झाला होता. याच मेळाव्यात विविध गटांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.
बारा बलुतेदार संघटनेसह २० ते २२ संघटना उद्याच्या परिषदेत सहभागी होत असल्याची माहिती याप्रसंगी बालमुकुंद भिरड यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीत सामील राजकीय पक्षांची ज्या ठिकाणी जशी वोट बँक सक्षम असेल, त्याप्रमाणे आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरला असल्याचे यावेळी पत्रपरिषदेत सांगण्यात आले.
या पत्रपरिषदेला भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे, जिल्हा प्रवक्ता राजा गणवीर, नंदकिशोर नीलकण, शहराध्यक्ष दिनेश करमनकर, राजेंद्र तलवारे, निरंजन खडसे, धनगर समाजाचे उपाध्यक्ष विशाल पोले, गुणवंत मानकर, अनिल चुनारकर, अशोक शेंडे, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.