नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – बहुजन समाजातील महापुरुषांच्या संघर्षामुळे ओबीसी समाज जागृत झाला आहे. १९९२ मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्तरावर ओबीसी शक्तीची एकजूट व्हायला लागली. मात्र, ओबीसी शक्ती राजकीय शक्तीत परावर्तित होऊ नये, यासाठी आरक्षणाच्या नावावर त्यांना तीन भागांत विभाजित करण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकार करीत असल्याचा घणाघाती आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी केला. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या (बीआरएसपी) वतीने नुकतेच विदर्भस्तरीय ओबीसी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सुरेश माने होते.
विदर्भ अध्यक्ष दशरथ मडावी, लोकजागर पार्टीचे अध्यक्ष व प्रख्यात कवी ज्ञानेश वाकुडकर, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्रा. जवाहर चरडे, बीआरएसपीचे महासचिव जी. एम. खान प्रामुख्याने उपस्थित होते. माने म्हणाले, मंडल कमिशन लागू झाले. पण, अद्यापही ५२ टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाला नोकऱ्यांमध्ये १२ टक्केही वाटा मिळालेला नाही. सरकार ओबीसी आरक्षणाला तीन भागांत विभाजित करू पाहत आहे. ओबीसी शक्तीला विभाजित करून कमजोर करण्याचा भाजपा सरकारचा हा डाव आहे. ‘फूट पाडा आणि राज्य करा’ अशी ही नीती आहे. ओबीसींमधील विविध जातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतर जातींना अप्रत्यक्षरीत्या ओबीसी आरक्षणात टाकले जात आहे. त्यामुळे आता बहुजन समाजाने जागृत होण्याची गरज आहे.
मानसिक गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचेही माने यांनी नमूद केले. यावेळी अन्य मान्यवरांचीही समयोचित भाषणे झालीत. प्रास्ताविक प्रा. रमेश पिसे यांनी तर संचालन शकील अहमद यांनी केले. दादा हटवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू, कोषाध्यक्ष रमेश पाटील, शहराध्यक्ष राजेश बोरकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा. मंगला पाटील, माया मेश्राम, विश्रांती झामरे, विधानसभाप्रमुख दिनकर वाठोरे, सी. डी. वाघमारे, संजय इखार, विलास पारखंडे, पुष्पा मेश्राम, सिंधू थूल, यशोधरा नानवटे, यशोधा शिंगाडे, रेखा मेश्राम आदींनी परिश्रम घेतले