लातूर : बहुजननामा ऑनलाइन – सरपंचास गावाच्या कामाचा जाब विचारल्यामुळे पोलीस भाच्याला सोबत घेऊन सरपंचाने बाप-लेकांना अमानुष मारहाण केल्याची घटना रेणापूर तालुक्यातील आसराची वाडी येथे घडली होती.
आता गावात अल्पसंख्याक असलेल्या या कुटुंबावर छुपा सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला असून तो दूर करण्यात यावा आणि मारहाण करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करीत भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून लक्ष वेधले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून त्यात, तिरमल समाजातील बाप-लेकांना मारहाण करणाऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी. मारहाण करणारे सरपंच व पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बाप-लेकांची वैद्यकीय खर्चाची जबाबदारी शासनाने घ्यावी.
तिरमल समाजावर टाकण्यात आलेला छुपा बहिष्कार दूर करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. भटक्या विमुक्तांचे नेते प्रा. सुधीर अनवले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात रामकुमार रायवाडीकर, दिलीप आरळीकर, हर्षवर्धन कोल्हापुरे, सुग्रीव काटके, पांडुरंग जगदाळे, शंकर किशन भारती, श्रीरंग जगदाळे, चंद्रकांत चिंताले, श्रीधर काटके यांच्यासह भटक्या विमुक्त समाजाच्या असंख्य बांधवांची उपस्थिती होती.