लातूर : बहुजननामा ऑनलाइन – भाजपा आणि काँग्रेसला राफेलप्रकरणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असले तरी, याप्रकरणाची खरी माहिती जनतेसमोर येऊ द्यायची नाही. ते सत्य माहिती दडवत आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रा. सुभाष भिंगे, भारिपचे जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सूर्यवंशी, माणिक करवंजे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
राफेलप्रकरणी काँग्रेसने जेपीसीची केलेली मागणी फसवी असल्याची टीका करून डॉ. आंबेडकर म्हणाले, आता ९० दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला याप्रकरणी सत्य बाहेर आणायचे असते तर त्यांनी पब्लिक कमिटीकडे मागणी केली असती. तर या कमिटीला कागदपत्रे देणे सरकारला बंधनकारक होते. तसेच या कमिटीचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आहेत. मग काँग्रेसने ही कागदपत्रे का मागितली नाहीत, याचा खुलासा करावा, असे ते म्हणाले. राफेल प्रकरण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.
त्यामुळे याप्रकरणी काँग्रेस आणि भाजपाने सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे. १६०० कोटींच्या एका राफेल विमानाऐवजी तीन ‘सुखोई ३१’ ही विमाने आली असती. शिवाय एचएएलला डावलणे म्हणजे सरकार गुन्हेगार असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसने जेपीसीची केलेली मागणी फसवी असल्याचे सांगून ते म्हणाले, काँग्रेसने संसदेत या प्रकरणाची कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असा ठराव जरी घेतला असता तरी या प्रकरणाचे सत्य बाहेर आले असते, असे आंबेडकर म्हणाले.