६ डिसेंबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी येत असतात. इतकेच नव्हे तर विविध ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांमधून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन करण्यात येते. मात्र बाहुली येथील युवा पॅंथर संघटनेच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयीच्या विचारांना चालना देण्यासाठी बाहुली जिल्हा नांदेड येथील विद्यार्थ्यांना वही आणि पेन देऊन आभिवादन करण्यात आले. इतकेच नव्हे तर देशाला महासत्ता बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारावर चालणे गरजेचे आहे असा संदेशही त्यावेळी देण्यात आला.
विशेष म्हणजे यावेळी चिमुकल्यांनिही भाषण करून प्रमुख पाहुण्यांची मने जिंकली. याचबरोबर सम्यक सूर्यवंशी या चिमुकल्यास उत्कृष्ट भाषण केल्या बद्दल उपस्थितांनी रोख बाकीस देऊन सत्कार केला.
यावेळी संदीप गायकवाड, अरुणकुमार सूर्यवंशी, हर्षवर्धन कांबळे, विकास डुमणे, अतुल कांबळे, किशन डुमणे, कामाजी डुमणे, टेकाळे, कदम, मैलारे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेबांचे शिक्षण बाबतचे मत !
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. इतकेच नव्हे तर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. याचबरोबर शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असायला हवे. यवबरोबर प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे.
शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्यांनी ध्यानी घ्यावे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय.