सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांपैकी मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याची एक महत्त्वाची मागणी होती. त्या मागणीनुसार सोलापुरात सुरू करण्यात आलेले मराठा वसतिगृह केवळ तीन महिन्यातच बंद पडले आहे. कारण, दिवाळीनंतर या वसतिगृहाकडे एकही विद्यार्थी फिरकला नाही. त्यामुळे वसतिगृह केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. मुख्यमंर्त्यांनी स्वत: या मराठा आरक्षणाबरोबर इतर सर्व मागण्यांत लक्ष घालून त्या मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्याची मागणी होती. त्यानुसार कोल्हापूरनंतर सोलापुरात जागेचा शोध घेऊन वसतिगृह सुरू करण्यात आले. सोलापुरात सुरू करण्यात आलेले मराठा वसतिगृह केवळ तीन महिन्यातच बंद पडले आहे. कारण, दिवाळीनंतर या वसतिगृहाकडे एकही विद्यार्थी फिरकला नाही.
यंदा रंगभवन येथे तात्पुरत्या स्वरूपात मराठा वसतिगृह सुरू करण्यात आले. कायमस्वरूपी वसतिगृह सुरू करण्यासाठी विविध संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यापैकी हरिभाई देवकरण प्रशालेजवळील मराठा समाज सेवा संघाच्या गावडे मंगल कार्यालयात कायमस्वरूपी वसतिगृह सुरू करण्याचा विचार आहे. तसा प्रस्तावही तयार झालेला आहे. त्याला शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.