सिनेअभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे आवाहन
चाळीसगाव (जळगाव) : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवत तरुणांनी त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे आवाहन सिनेअभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कोल्हे याच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ए. टी. पाटील होते. व्यासपीठावर माजी केंद्रीयमंत्री एम. के. पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भारतीय कृषी व अनुसंधान परिषदेचे (नवी दिल्ली) सदस्य कैलास सूर्यवंशी, माजी आमदार साहेबराव घोडे, राजीव देशमुख, आर. ओ. पाटील, बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय व राज्य स्तरावरील शिक्षणातील अभ्यासक्रम बघितले असता त्यात आपल्याला मुसोलिनी, हिटलर, नेपोलियन बोनापार्ट शिकविला जातो. दहावीच्या वर्षात आपल्याला दुसरे महायुद्ध व रशियन व फ्रेंच राज्यक्रांती शिकवल्या जातात. परंतु, आपल्याला दुसरे छत्रपती राजे संभाजी महाराजांचा इतिहास शाळांमध्ये शिकविला जात नाही, अशी खंतही डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. जो राष्ट्र उभारणरसाठी उभा राहतो. जो राष्ट्र रक्षणासाठी खर्ची पडायला तयार असतो. तो शिवरायांचा मावळा व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे अन् नाक्यावर जाऊन आया-बहिणींची छेड काढायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणू नका. असे बजावत महाराजाचे नाव घ्यायचं असेल तर त्याचे विचार, त्यांचे आदर्श आचारणात आणा. जिजाऊ असल्याशिवाय शिवराय पूर्ण होत नाही. अन शिवराय निर्माण झाल्याशिवाय जिजाऊच्या आयुष्याला पूर्णत्व येत नाही, असेही या वेळी डॉ. कोल्हे म्हणाले.