पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा येथे असलेल्या ऐतिहासिक विजयस्तंभ परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा १ जानेवारी १८१८ रोजी पराभव केला होता. या लढाईला यंदा २०१ वर्षे पूर्ण झाली. या विजयाचे प्रतीक म्हणून कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातील विविध संस्था, संघटना आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात.
दरम्यान कोरेगाव भीमा येथे असलेल्या ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आले असता, त्यानंतर आभिवादन झाल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने ६३ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यात वाढ करून शंभर कोटी रुपयांचा आराखडा करण्यात यावा याचबरोबर कोरेगाव भीमा येथे असलेल्या ऐतिहासिक विजयस्तंभ परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणीही आठवले यांनी केली.
इतकेच नव्हे तर विजयस्तंभ परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करू. मागील वर्षीच्या कटू आठवणी विसरून यंदा सामाजिक सलोखा दिसून आला. असाच सामाजिक सलोखा यापुढेही कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.