लातूर : बहुजननामा ऑनलाइन – ओबीसी हिताच्या मागण्यांसंदर्भात शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध व ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी येत्या २८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच ओबीसी आरक्षण विरोधात सराटे यांनी दाखल केलेल्या याचिकेविरोधात आव्हान याचिका दाखल करण्याचा निर्णय येथे ओबीसींच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र ओबीसी आरक्षण संरक्षण कृती समितीच्या वतीने लातुरात ॲड. अण्णाराव पाटील यांच्या शामनगरमधील निवासस्थानावरील परिवर्तन सभागृहात ओबीसी बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील कपात, ओबीसी आरक्षण विरोधातील याचिकेत शासनाची बोटचेपी भूमिका घेतली. त्यामुळे ओबीसी आरक्षणावर संकट निर्माण झाले आहे. ओबीसी आरक्षण संरक्षण समितीच्या वतीने एक महिन्यापासून जिल्हाभर ओबीसी जागरण बैठका तसेच धरणे आंदोलने, मोर्चे काढून शासनाविरोधात आवाज उठवण्याचे काम चालू आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयावर २८ जानेवारी रोजी एल्गार मोर्चा काढण्यात येईल व ओबीसी आरक्षण विरोधात सराटेंच्या याचिकेविरोधात आव्हान याचिका ओबीसी समाजातर्फे दाखल करण्यात येईल, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
या आंदोलनास सावता परिषद लातूर, बारा बलुतेदार महासंघ, ओबीसी पिछडा संघ, महाराष्ट्र मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन, राजे यशवंतराव होळकर संघटना, सुवर्णकार सेव संघ, ओबीसी सेवा संघ, महात्मा फुले ब्रिगेड, समता परिषद लातूर, अ.भा.माळी महासंघ, अ.भा.नाभिक महासंघ, कुंभार सेवा मंडळ, विश्वकर्मा सेवा संघ, वंचित विकास आघाडी यांनी पाठिंबा तसेच सक्रीय सहभागाचे आश्वासन सदरील बैठकीत संघटना प्रमुखांनी दिले. बैठकीस ओबीसी आरक्षण संरक्षण समितीचे समन्वयक ॲड. गोपाळ बुरबुरे, अफजल कुरेशी, भारत काळे, अनंत चौधरी, रघुनाथ मदने, ॲड. राजेश खटके, दयानंद चोपणे, अजित निंबाळकर, शरद पेठकर, प्रा. एन.जी.माळी, गुरुनाथ मोहोळकर, छायाताई गिरी, प्रवीण नाबदे, मंगेश तिडके, गोविंद श्रीमंगले, अजित माळी, विशाल क्षीरसागर, गोविंद सलगर, विशाल माळी यांच्यासह ओबीसी आरक्षण संरक्षण समितीचे सर्व समन्वयक उपस्थिती होते.