कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीविना धनगर समाजावर अन्याय झाला आहे. या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. केवळ क्रेडिट घेण्यासाठी नव्हे, तर धनगर समाजाला न्याय मिळावा यासाठीच आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चाललोय. काही झाले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच धनगर समाजाला आरक्षण देणार, असा पुनरुच्चार राज्याचे पशुधन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्री जानकर कोल्हापुरात आले होते, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा अटीतटीचा प्रश्न या सरकारने सोडवला. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाशिवाय मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नव्हते. त्या अहवालानंतरच कायद्याच्या चौकटीत हा प्रश्न सक्षमपणे सोडवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाचाही प्रश्न आम्हाला सोडवायचाच आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राज्याच्या अखत्यारितील होता म्हणून तो लगेच सुटला; परंतु धनगर समाजाचा हा प्रश्न केंद्र शासनाच्या अखत्यारितील आहे. त्यामुळे फक्त राज्याने शिफारस करावयाची आहे.
पूर्वीच्या सरकारने केलेल्या शिफारशी फेल ठरल्या. त्यामुळे जरी टाटा इ्स्टिटट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) संस्थेद्वारे सर्व्हे करून त्यांचा अहवाल पाहूनच शिफारस करावयाची आहे. अहवालही चांगला आहे. जरी नकारात्मक आला असता तरी राज्य शासनाने तो धनगर समाजहितासाठी तो अहवाल सकारात्मक करून कायद्याच्या चौकटीत बसेल अशी शिफारस करण्यात येणार आहे. ज्यांना आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा पुळका येतोय त्यांनी काय केले, अशी टीकाही मंत्री जानकर यांनी विरोधकांवर केली.