कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – धनगरांना आरक्षण न देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या बुडाखाली जाळ लावायची वेळ आली आहे. केवळ धनगर समाजाच्या मतांमुळेच भाजप सरकार सत्तेवर आले आहे. एक महिन्यात धनगरांच्या मुलांच्या हातात एसटी जातीचा दाखला मिळत नाही, तोपर्यंत सरकारविरोधी लढा चालूच राहील आणि जर जातीचा दाखला दिला नाही तर यापुढे भाजपाने परत सत्तेत यायची स्वप्ने बघणे सोडावे. सरकारविरोधातील ही लढाई आता कोल्हापुरातून सुरू झाली आहे. आरक्षण मिळेपर्यंत या सरकारच्या छाताडावर बसून लढा सुरूच राहील, असा इशारा धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी पट्टणकोडोली येथील धनगर आरक्षण परिषदेत दिला.
उत्तमराव जानकर म्हणाले, या धनगर आरक्षणाचा लढा जिंकायचा आहे आणि आरक्षणाचा प्रश्न ७० वर्षे तसाच राहिला आहे. वेळोवेळी धनगर समाजाची फसवणूक सरकारने चालवली आहे; परंतु महाराष्ट्र सरकार अद्याप आमची केवळ फसवणूकच करत आहे. त्यामुळे ही समाजक्रांतीची लढाई अशीच चालू राहील आणि म्हणूनच आता धनगरांना आरक्षण मिळाले नाही तर अब की बार नक्कीच मोदी फरार अशी भूमिका घ्यावी लागेल. निर्ढावलेल्या या सरकारला धडा शिकवण्यासाठी आता मागेपुढे पाहून चालणार नाही.
गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते धनगर समाजाच्या उपस्थित नेत्यांना यशवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संदीप कारंडे, उपसरपंच धुळा डावरे, सिद्राम भानसे, लक्ष्मण पुजारी, राणोजी पुजारी, नारायण मोठे, बाबूराव हजारे, नागेश पुजारी, राजू दलवाई, तात्यासोा हराळे, कृष्णात शेळके, स्वप्नील नांगरे, अभिजित कोळेकर आदींसह हजारोंच्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते.