नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – अखिल भारतीय आदिवासी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
आदिवासी बांधवांचा हा मोर्चा संघटनेच्या अध्यक्ष लता बर्डे यांच्या नेतृत्वाखाली निघाला. अमृतधाम येथील बर्डे निवास या ठिकाणी जमलेल्या आदिवासी बांधवांचा पायी मोर्चा क. का. वाघ कॉलेज मार्गे जुना आडगाव नाका येथून निमाणी बस स्टॅण्ड, पंचवटी कारंजा मार्गे शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचला. यावेळी अदिवासींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासींच्या नवीन शर्त, जुनी शर्त असलेल्या वडिलोपार्जित जमिनी इतरांनी फसवणूक अथवा गैरमार्गाने जनरल करून घेतल्या आहेत. त्या जमिनी परत आदिवासींना देण्यात यावी. पूर्वापार, वंशपरंपरागत कसत असलेल्या वन जमिनी, इनाम, गाळपेरा या जमिनी आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे करून त्यांना सातबारा उतारा द्यावा,सरकाराने गावरान, पडित सरकारी जमिनीचे सपाटीकरण करून भूमिहीन आदिवासींना प्रत्येकी अडीच एकर जमीन कायमस्वरूपी कसण्यास द्यावी, आदिवासी भागात अथवा पाड्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची शैक्षणिक, आरोग्य, वीज, पाण्याची आवश्यक सुविधा नाही. त्या लवकर सुरू करण्यात याव्या आणि आदिवासींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संदीप महाले, संपर्कप्रमुख सधाम बर्डे, बब्बू शेख, ओम गांगुर्डे यांसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते