नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – मराठा समाज आप्तस्वकीय स्नेहसंवर्धक मंडळातर्फे मराठा समाजातील ४० उद्योजकांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उद्योग निर्मितीसाठी युवकांना मार्गदर्शन करतानाच युवा पिढीने उद्योगाकडे वळावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. वडाळा – पाथर्डी रोडवरील सुदर्शन लॉन्स येथे मराठा समाज आप्तस्वकीय स्नेहसंवर्धक मंडळातर्फे वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात समाजातील उद्योजकांच्या सत्कारप्रसंगी ‘यशस्वी उद्योजकांची यशोगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील प्रतिष्ठित उद्योजक अर्जुन गायके होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील मराठा उद्योजक विकास मंडळाचे अध्यक्ष आनंद चौथे, अंबरनाथ महापालिकेतील नगरसेवक उन्मेश गुंजाळ, विक्रीकर विभाग, मुंबईचे उपायुक्त राजेश जाधव, उद्योजक धर्मराज नथू पाटील, संतोष साळुंखे, विष्णू बाळदे, आदिवासी विकास विभागाचे महाव्यवस्थापक उत्तम कावडे उपस्थित होते. मंडळाने खरेदी केलेल्या जागेत गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याचा मानस मंडळाचे उपाध्यक्ष शंकर जाधव यांनी व्यक्त केला.
डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे, प्रवीण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष तथा माजी सहायक पोलीस आयुक्त विक्रम मराठे, सचिव राजू मोरे, संचालक दत्तात्रय सोनवणे, सुभाष मराठे, राजू कोल्हे, सदस्य लक्ष्मण मते, सचिन जाधव, राकेश सोनवणे, संदीप निकम, योगेश जाधव, चेतन जगताप, शेखर इंगळे, अरुण मराठे आदींनी परिश्रम घेतले.