श्रीगोंदा : बहुजननामा ऑनलाईन-भारतीय सैन्यात कर्तव्य बजवात असलेले अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज गावचे वीरपुत्र कपिल नामदेव गुंड यांना सीमेवर झालेल्या चकमकीत वीरमरण आले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या गावावर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे घर शोकसागरात बुडाले आहे.
मागील काही दिवसापासून सीमेवर दहशतवादी आणि पाकिस्तानच्या सैन्याकडून सतत गोळीबार होतो आहे. त्यातच मागील काही दिवसात सीमावर्ती भागाला गुप्तचर विभागाने हाय अलर्ट दिला असताना रविवारी दुपारी हि घटना घडली आहे. जम्मू काश्मीर अथवा दिल्ली मध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवला जाऊ शकतो अशा शक्यता गुप्तचर विभागाने मागच्या दोन दिवसापूर्वी वर्तवल्या होत्या तर परवाच झालेल्या चकमकीत सैन्याचे एक जवान शहीद झाले होते. आज पुन्हा एका भारतीय जवानाला भारत भूमीच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे.
कपिल गुंड हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते त्यांच प्रमाणे गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्या मनात होती असे त्यांच्या गावातील लोकांनी सांगितले असून त्यांच्या जाण्याने गावाचे फार मोठे नुसकान झाले आहे. असे गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. कपिल गुंड यांच्यावर उद्या सकाळी त्यांच्या मूळगाव अजनूज येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.