चंद्रपुर : बहुजननामा ऑनलाइन – दलित साहित्याचा प्रवाह हा साधरणत: १९६० नंतर चालू झाला. जो तुटलेला माणूस होता, तो जोडण्याचे काम दलित साहित्याने केले. जगात नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन यांची नावे आपण ऐकली असाल. यांनी आपल्या कार्याने इतिहास रचला. दलित साहित्य चळवळीचे साहित्य होते. या साहित्याने आपल्याला आत्मभान दिले, असे विचार डॉ. युवराज मेश्राम यांनी व्यक्त केले. ते मराठी भाषा संवर्धन कार्यक्रमात ‘दलित साहित्याचा इतिहास’ या विषयावर बोलत होते.
प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. धनराज खानोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रकाश वट्टी, प्रा. पद्माकर वानखडे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. खानोरकर यांनी दलित साहित्य हे मानवाच्या उत्थानासाठी जन्माला आलेली घटना असून, या साहित्याने इतिहास घडविला. हे साहित्य वेदना, विद्रोह आणि नकार पोटात घेऊन जन्मले. संचालन पद्माकर वानखडे यांनी केले. तर आभार मृणाल ठेंगरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी कविता घोरमोडे, प्रशांत राऊत, गोपाल करबे यांनी सहकार्य केले.