औरंगाबाद ( बहुजननामा ऑनलाइन ) – मॉब लिंचिंगचे लोन आता महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरामध्ये पोहचले आहे. औरंगाबादमध्ये रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास जय श्री रामच्या घोषणा देण्याची सक्ती करत एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करण्यात आली. १० ते १२ अज्ञातांनी मारहाण केल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे. मारहाण झालेली व्यक्ती ही झोमॅटोचा कामगार असल्याचे समोर येते आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेआधी देखील शनिवारी (दि.२०) इम्रान पटेल या मुस्लिम तरुणाला हडको कॉर्नरजवळ अडवून मारहाण करण्यात आली होती. तसेच त्याला जय श्रीरामच्या घोषणा देण्यास भाग पाडले गेले होते. ही घटना ताजी असतानाच तशीच एक घटना औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा घडली असल्याने अल्पसंख्यांक समाजाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मॉब लिंचिंग (झुंडबळी) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. उत्तर भारतामध्ये या घटना सर्वाधिक घटन आहेत मात्र त्याचे लोन आता संपुर्ण देशभर पसरत आहे. या विरोधात सरकारने कठोर कायदा करावा असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर या प्रकरणांसाठी आधीच कायदे आहे त्याचा वापर राज्य सरकारांनी करावा असे केंद्र सरकारचे मत आहे. या प्रश्नावरुन खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दोषींना जास्तीत जास्त शिक्षा करण्याची मागणी लोकसभेत केली होती.