यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली खरी पण या योजनेतुन जवळपास ३० लाख पात्र शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित राहिले असल्याचे समोर आलं आहे. शेतकरी सन्मान योजनेतून राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास २४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती परंतु आतापर्यंत मात्र फक्त २० लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला, तर ३० लाख पात्र शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित राहिले असल्याचे चित्र आहे.
२०१७ मध्ये युती सरकारने दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज बहरून घेण्यात आले. आणि बँकांकडूनही अहवाल मागविला परंतु केलेले अर्ज व अहवाल यातील माहितीत तफावत होती. या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम अजूनही पूर्ण न झाल्याने शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे.
दोन वर्ष उलटून गेल्यांनतरही कर्जमाफीसाठी पात्र असलेले शेतकरी लाभापासून वंचित आहेत. आता तालुका पातळीवर कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी सहायक निबंधकांच्या समितीमार्फत करण्यात येत आहे. छाननी झाल्यांनतर ग्रीनलिस्ट जाहीर होणार आहे. या योजनेत दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असणारे शेतकरी वरची रक्कम भरल्यावर पात्र ठरणार आहेत. अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच राज्यात पडलेल्या दुष्काळाचा विचार करता ही रक्कम कुठून भरावी हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. त्यामुळे वनटाइम सेटलमेंट योजनेत आपण पात्र ठरणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
करावा लागतोय या अडचणींचा सामना
२०१५ पूर्वी या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले मात्र, पुनर्गठणाचे हप्ते यानंतर पाच वर्षांत फेडायचे आहेत. घेतलेले कर्ज दीड लाखांच्या आत असले, तरी ठरावीक वर्षापर्यंतच ही कर्जमाफी मिळणार असल्यामुळे असे अनेक शेतकरी कर्जमाफी मिळाल्यानंतरही थकबाकीदार राहण्याची शक्यता आहे.
पेरणीपूर्वी कर्जमाफी होईल असे राज्य सरकारने कर्जमाफीची योजना जाहीर करताना सांगितले होते. नंतर यात अनेक तांत्रिक अडचणी आल्या आणि आता दोन वर्षे उलटल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना पात्र असूनही कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.