बहुजननामा ऑनलाइन टीम – वेतन रखडल्याने रत्नागिरी डेपोत काम करणाऱ्या एका एसटी चालकाचा मृतदेह भाड्याच्या घरात आढळून आल्याचे प्रकरण ताजे असतानाच, दुसरीकडे जळगाव आगारात चालक म्हणून नोकरीला असलेल्या कर्मचाऱ्याने आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या(Thackeray government) केल्याची घटना समोर आली. यावरून विरोधक आक्रमक झाले असून, या मृत्यूची जबाबदारी सरकार घेणार का, असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
याबाबत ट्विट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “वेतन न मिळाल्याने २ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. या अतिशय वेदनादायी, मनाला अस्वस्थ करणाऱ्या घटना आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करूनसुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही २ कुटुंबे उघड्यावर आली आहेत. आता तरी सरकारने जागे व्हावे. एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबे अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत. जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार? या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का?,” अशी विचारणा फडणवीस यांनी केली आहे.
आता तरी सरकारने जागे व्हावे.
एसटी कर्मचार्यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत.
जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार❓
या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का❓#JusticeForSTemployees— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 9, 2020
ठाकरे सरकारविरोधात ३०२ कलमांतर्गत गुन्हा नोंदवा – प्रवीण दरेकर
“गेल्या दोन दिवसांत एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी वेतन मिळत नसल्याने आत्महत्या केली आहे. तरीसुद्धा हे ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे. त्यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या ठाकरे सरकारवर ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी आग्रही मागणी करतानाच कर्मचाऱ्यांचे थकित वेतन दिवाळीपूर्वी द्या; अन्यथा भाजपच्यावतीने टोकाची भूमिका घेण्यात येईल,” असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.
सरकार संवेदनाहीन झालाय – गिरीश महाजन
“राज्यातील सर्वच वर्गात तीव्र नाराजी असून, सरकार कोण चालवतंय, कुणाचाच काहीच समजायला मार्ग नाही. आज एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीमागं आहे, घरातील कर्ता माणूस निघून गेल्याने मोठे संकट कुटुंबीयांवर कोसळलंय. मात्र, सरकारला जाग येत नाही, कोणीही या पीडित कुटुंबीयांना भेटायला तयार नाही, सरकार संवेदनाहीन झालंय,” असा आरोप गिरीश महाजन यांनी केला.