नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्याच्या प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज ९. ३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. काश्मीरमधील सध्याची परिस्थिती तसेच या बैठकीत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय संसदेत सादर करण्यात येणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी या उच्च स्तरीय बैठकचे आयोजन केले आहे. त्यामुळे काश्मीर मध्ये नक्की काय घडतंय ? या प्रश्नावर काहीच वेळात उत्तर देशाला मिळणार आहे.
रविवारी रात्रीपासून काश्मीरमधील हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या मनात काश्मीर संबंधात नक्की काय आहे ? हे स्पष्ट होणार आहे. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. रात्री उशिरा पर्यंत राज्यपाल आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु होती. त्यामुळे काश्मीर बाबत चर्चेला उधाण आलं आहे. अमित शहा यांची घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवाल, गुप्तचर खात्याचे अधिकारी, केंद्रीय गृह सचिव उपस्थित होते. अजित डोवाल यांना पत्रकारांनी काश्मीरबाबत विचारतांना त्यांनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता हसत निघून गेले. परंतु या संबंधीचा संपूर्ण आढावा पंतप्रधानांना दिला जात आहे.
काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याबाबत राज्यातील नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. या कारणास्तव काश्मीर मध्ये वातावरण तापले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार संसदेत अधिवेशन उशिरा सादर करू शकते, ज्यामध्ये काश्मीर बाबत चर्चा होणार आहे. पुढील आठवड्यात अमित शहा काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत.
सध्या इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. परंतु त्याआधी मुफ्तीयांनी केलेल्या ट्विट मध्ये त्या म्हणतात. ” इंटरनेट सेवा लवकरच बंद करण्यात येण्याची शक्यता आहे. संचारबंदी लागू केली जात आहे. अल्लाह जाणे , काय होणार आहे. पण या कठीण प्रसंगी आपण राहून एकत्रितपणे याचा सामना करायला हवा. ” उमर अब्दुला यांनी हे रिट्विट केलं आहे. संपूर्ण काश्मीर राज्यात सुरक्षा यंत्रणेचा चोख बंदोबस्त केला आहे. जवळपास सैनिकांच्या ४० तुकड्या यासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत. काश्मीरच्या घाटापर्यंत सगळीकडे सुरक्षा यंत्रणा तैनात आहे.