बहुजननामा ऑनलाईन – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल अपमानापस्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मातंग समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ते पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या भाष्यामुळे रामदास आठवले यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाविरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा. अशी तक्रार अॅड. संजय वानखेडे यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ३ जुलै रोजी पिंपरी चिंचवड येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जनशताब्दी कार्यक्रमात आठवले यांनी अण्णाभाऊ यांनी लिहलेल्या गीतांचा अपभ्रंश करून म्हंटले की माझी मैना गावाकडं राहिली, म्हणून मी मुंबईकडे दुसरी पहिली. असे भाष्य आठवले यांनी केले. त्यामुळे मातंग समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच आठवले यांच्या या अशा वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते आणि समाजात अशांतता ही पसरवू शकते.
दरम्यान आठवले यांनी शासकीय कार्यक्रमात अण्णाभाऊ यांचा अपमान केला आणि या कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले होते. तसेच या प्रकरणाला पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे. त्यामुळे यांच्या विरोधात भादंविच्या कलम २९५(अ), ५०४, १२०(ब) व अॅट्रॉसिटी अॅक्टचे कलम ३(१), (यू), (व्ही) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाची तक्रार मानवहित लोकशाही पक्षाचे विदर्भ अध्यक्ष अॅड. संजय वानखडे यांनी फ्रेजरपुरा पोलिसांत दिली आहे.