मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाचे संकट गडद होत असतानाच अॅम्फान चक्रीवादळ रौद्ररुप धारण करण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात अॅम्फान अतिशय भीषण चक्रीवादळ बनू शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळामुळे परिसरात वादळी वार्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. समुद्रात उंच लाटा निर्माण होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या खाडीच्या दक्षिणेत असलेले हे वादळ हळूहळू वायव्य दिशेला सरकत आहे. येत्या काही तासात त्याचे रुपांतर भीषण चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगालमधील दीघा आणि हटिया इथे 20 मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी हे वादळ धडकण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांनी पुढील तीन दिवस बंगालच्या खाडीत प्रवेश न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जे आधीच समुद्रात आहेत, त्यांना परतण्यास सांगितले आहे. या चक्रीवादळाचा परिणाम देशातील आठ राज्यांवर जाणवू शकतो. परिणामी इथे जोरदार पाऊस आणि आणि वादळी वार्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेटांवरही या चक्रीवादळाचा परिणाम दिसू शकतो. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जाजपूर, भद्रक, बालासोर, मयूरभंज, गंजम, जगतसिंहपूर, गजपती, नयागड, कटक, केंद्रपाडा, खुर्दा आणि पुरीच्या जिल्हाधिकार्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे तामिळनाडूतही अॅम्फान चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. रविवारी वादळी वार्यामुळे शेकडो झाडं कोसळली तसंच मोठं नुकसानही झालं. कोईम्बतूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये झाडे पडली आहेत. चक्रीवादळाचा धोका पाहता खबरदारी म्हणून सुमारे 11 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची सोय केली आहे. जगतसिंहपूर, केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर या समुद्रकिनार्यावरील चार जिल्ह्यांवर नजर ठेवून आहोत, अशी माहिती ओदिशाचे विशेष बचाव आयुक्त पीके जेना यांनी दिली.