औरंगाबाद ( बहुजननामा ऑनलाइन ) – गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस होतो आहे, तर मराठवाड्यातील काही भागात अजुनही पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने पावसाबद्दल वर्तवलेले अंदाज चुकीचे ठरत आहेत. त्यामुळे शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी अनोखे आंदोलन करत हवामान खात्यापेक्षा नंदीबैल बरा असा पवित्रा घेतला आहे.
जयाजीराव सूर्यवंशी यांनी थेट नंदीबैलालाच पाऊस पडणार का ? दुष्काळ पडेल की अतिवृष्टी होईल ? शेतकरी सुखावेल का ? असे प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न विचारतानाचा व्हिडीओ देखील त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. कारण मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला होता. तसेच मराठवाड्यात देखील पाऊस येईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र ना मुंबईत मुसळधार झाला ना मराठवाड्यात पाऊस पडला त्यामुळे हवामान खात्यापेक्षा नंदीबैलावरच विश्वास ठेवलेला बरा असे जयाजीराव सूर्यवंशी यांनी म्हणत हवामान खात्याचा निषेध नोंदवला आहे.
जयाजीराव सूर्यवंशी यांचा नंदीबैलाला प्रश्न विचारणार व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हे अनोखे आंदोलन पुणे शहरात हवामान विभागाच्या समोर केले असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. मात्र असे कोणतेही आंदोलन पुणे शहरात झाले नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे आंदोलन पुणे शहरात नाही तर औरंगाबादमध्ये झाल्याचे सांगण्यात येते आहे. जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले की, मराठवाड्यात अद्यापही पाऊस आलेला नाही. हवामान विभागाकडून पाऊस पडणार असा अंदाज रोज व्यक्त करण्यात येतो. मात्र तो चुकीचा ठरतो आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या सततच्या चुकत असलेल्या अंदाजांना कंटाळून शेवटी सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय अशी विनंती आम्ही करतो आहोत.